रेल्वे स्टेशन वरून बाहेर पडलो आणि ‘कटरा-वैष्णो-देवी’ला घेऊन जाण्यासाठी थांबलेले असंख्य टॅक्सी-वाले, ट्रॅव्हल-कंपन्यांचे एजंट्स अंगावर तुटून पडले. रेल्वेमधला तो सुखद गारवा आता आमच्या सोबत नव्हता, जम्मू मधील कडक ऊन भाजून काढत होते. काश्मीर मध्ये फिरण्यासाठी आम्ही जम्मूहूनच एक टेम्पो-ट्रॅव्हलर बुक केली होती, त्याच्या ऑफिसवर आम्ही सामानासहित धडकलो. आमचे श्रीनगरला पोहोचण्याचे शेवटचे आशास्थान तोच होता. पण त्यानेही जम्मू-श्रीनगरच्या बंद असलेला महामार्ग आणि तेथील बिकट परिस्थितीला दुजोरा दिला.
वैतागुन आम्ही पुन्हा आमच्या श्रीनगर मधील contact ला फोन केला.
“सर, यहा सब ठिक हैं, कोई रास्ता बंद नाही हैं, सुबह मेरी एक बस श्रीनगरसे जम्मू केलीये निकली है, अभी वहा पोहोंचती होगी. आप आ जाओ ”
त्याचे बोलणे ऐकून आम्ही जम्मू मधल्या त्या टेंम्पो-ट्रॅव्हलर वाल्यालाच झापला.
“क्या भैया, वहा श्रीनगर मै बैठा आदमी बोल राहा हैं सब ठीक है, और आप कूछ अलग बोल रहें है”
मग त्याच पण डोकं सणकल. “ये देखो.. अपनी आखोंसे देखो.. “, समोर उभ्या असलेल्या दोन तवेरा गाड्यांकडे बोट दाखवत तो म्हणाला, “कल हि श्रीनगर से आई हैं, देखो काच फुटे है गाडियोंके. .. ”
त्याने आमच्याकडून फोन घेऊन त्या श्रीनगरवाल्याला फोन लावला. दोघांचं एकमेकांच्या आई-बहिणींचा उध्द्दार चालू होता. आम्हाला काय करावं काहीच कळत नव्हतं. कोण खरं? कोण खोटं? काहीच ठरेना. जम्मूला उतरून एव्हाना तासभर उलटून गेला होता आणि constructive असे काहीच ठरले नव्हते.
वाटत होतं, तो श्रीनगर वाला कश्याला खोटं बोलेल, त्याचे पैसे तर त्याला आधीच मिळाले होते. आम्ही गेलो काय आणि नै गेलो काय. पण मग हा ट्रॅव्हलर वाला तरी का खोटं बोलेल? त्याला ५ दिवसांचे पैसे देणारच होतो, इकडे गेलो काय आणि अजून कुठे गेलो काय.
आमच्या आमच्यात आता ३ गट पडले होते –
१. श्रीनगरला जाऊयात वाला
२. नो श्रीनगर, दुसरा ऑप्शन बघू वाला
३. काहीही चालेल वाला
श्रीनगरच्या परिस्थितीची मला भीती वगैरे आज्जीबातच नव्हती. पण प्रश्न हा होता कि श्रीनगर ला न पोहोचता, मध्येच रस्त्यात दिवस-रात्र अडकून पडलो तर? किंवा अगदी पोहोचलोच श्रीनगरला आणि तिथे कर्फ्यू मुळे सगळंच बंद असलं तर? दिवसभर काय नुसतं हॉटेल मध्ये बसून झोपा काढायच्या? शिवाय हा काय आपल्या आयुष्यातला किंवा कश्मीरच्या existance चा शेवटचा दिवस नव्हता, पुन्हा कधीही येऊच की… ह्या मताचा मी होतो.
जवळ जवळ दोन तास त्या ट्रँव्हलर मध्ये खडाजंगी वादावादी झाली, जो तो आपली मतं एकमेकांना पटवून देण्यात मग्न होता. आमचं बोलणं ऐकून इतक्या वेळ थोड्या अंतरावर उभा असलेला एक इसम अंदाज घेत आमच्या जवळ येऊन पोहोचला.
“मै लेके जाताय आपको श्रीनगर”
“कैसे? हायवे बंद होगा तो?”
“हायवेसे नही, दुसरा एक रिमोट एरीया से रास्ता है, रात के अंधेरे मै निकलेनेंगे, सुबह कैसे भी करके में आपको श्रीनगर पहुंचा दूंगा. वो देखो, मेरे साथ और दो लोग हैं, उनको भी जानेका है”, थोड्या अंतरावर थांबलेल्या दोन लोकांकडे बोट दाखवत तो म्हणाला
अर्थात असली रिस्क घ्यायला कोणीच तयार नव्हते. त्या गूढ इसमाचा पेहेराव, वाढलेली दाढी, पिंजारलेले केस पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणेही अशक्य होते. आम्ही त्याला नाही म्हणून कटवुन टाकले.
वादावादी चालू असताना एका बाजूने आम्ही गुगलींग चालू केले. श्रीनगर नाही, तर मग कुठे? इतक्या लांब येऊन पुन्हा तसेच माघारी जाणे शक्य नव्हते. गुगलबाबाने मार्ग दाखवला. जम्मू पासून ३००कि.मी.च्या आसपास हिमाचल प्रदेशातील डलहौसी हे प्रसिद्ध ठिकाण होते.
त्याच मार्गावर पुढे धर्मशाला हेही एक प्रसिद्ध ठिकाण होते.
आम्ही जिथे उभं होतो त्याच्या समोरच्या कमर्शील कॉम्प्लेक्स मध्ये आमच्या ट्रॅव्हलरवाल्या टुर-ऑपरेटरचे ऑफिस होते. आम्ही एक-दोघे जण तिकडे घुसलो. त्याला परिस्थितीची कल्पना होती. आम्ही आमचा ‘प्लॅन-बी’ समोर ठेवला. त्यानेही हा मार्ग योग्य असल्याचे सुचवले, शिवाय डलहौसी-धर्मशाला करतच आहात, तर त्याच मार्गावर मॅक्लॉडगंज आहे ते करा आणि पुढे अमृतसर-वाघा बॉर्डरही होऊ शकेल असे त्याने सांगितले.
येतानाची आमची फ्लाईट ‘श्रीनगर ते दिल्ली’ आणि ‘दिल्ली ते पुणे’ अशी connecting होती. श्रीनगर रद्द झाले तर निदान दिल्ली ला जाऊन ‘दिल्ली-पुणे’ विमान पकडता येणे शक्य होते.
काही दिवसांपूर्वीच माझा ऑफिसचा लुधियाना येथील सहकारी पुण्याला आला होता, तेंव्हा बोलताना त्याने मॅक्लॉडगंजचा उल्लेख केल्याचे स्मरणात होते. पुन्हा एकदा गुगलबाबाच्या मदतीने मॅक्लॉडगंज, धर्मशाला, डलहौसी चे फोटो चाळले. आणि आमचा निर्णय पक्का झाला. आम्ही पुन्हा आमच्या ट्रॅव्हलर कडे गेलो, तोवर इकडे काही ताज्या बातम्यांचे वृत्तपत्र, काही व्हॉटस-ऍप क्लिप्स आमच्या ड्राइव्हर ने इतरांना दाखवल्या होत्या. ते पाहून नकार देणारे आता काहीसे मवाळ झाले होते.
आम्ही त्यांना आमचा प्लॅन-बी ऐकवला, तेथील फोटो दाखवले आणि शेवटी हो नै- हो नै करता करता सगळे जण तयार झाले. लॉस खूप होतं होता. श्रीनगरचे राहण्याच्या जागेचे जे पैसे भरले होते ते, श्रीनगर-दिल्ली फ्लाईट चे पैसे डुबलेच होते. त्यात सिझन असल्याने डलहौसी-धरमशाला ठिकाणं आधीच हाऊस-फुल्ल होती, त्यामुळे जी हॉटेल्स मिळत होती ती महागडीच होती. शिवाय अमृतसर-ते दिल्ली साठी वेगळी सोया करणं आवश्यक होते. नाही म्हणलं तरी ४०एक हजाराचा फटका दिसत होता. पण दुसरा पर्याय पण नव्हता. “होऊ-दे-खर्च” म्हणत आम्ही प्लॅन-बी फायनल केला.
एव्हाना घड्याळात ३ वाजून गेले होते. सकाळ-पासून काहीच खाल्ले नव्हते ह्याची आता जाणीव झाली. आमच्या ड्राइव्हरने समोरच असलेले एक छोटे रेस्टोरंट दाखवले. “अमृतसरी-कुलचा” नावाची एक प्रसिद्ध रेस्टोरंट चेन आहे, त्यापैकीच एक जॉईंट तो होता.
बसायला अर्थातच जागा नव्हती, थोड्या वेटींग नंतर एक मोठ्ठे टेबल मिळाले आणि ८-१० कोल्ड्रिंक्स बरोबर ऑर्डर देऊन टाकल्या. काही वेळातच तो वाफाळलेला स्टफ्ड कुलचा समोर आला, त्यावर बटर-चा मोठ्ठा क्यूब तरंगत होता. एक घास थोडात टाकला आणि डोळे मिटले गेले. फारच भन्नाट चव होती त्याची, आत्ता लिहितानाही पुन्हा तोंडाला पाणी सुटलं. त्या कुलचा बरोबर छोले-कांदा-लींबू मिश्रीत एक सॅलड हि होते.
सुरुवात तर जोरदार केली, पण शेवटी शेवटी लक्षात आले कि कितीही भूक असली तरीही तो पूर्ण कुलचा खाणे केवळ अशक्य होते. शेवटी संपेल तितका खाल्ला, थंडगार कोल्ड्रिंक पोटात ढकललेले आणि काश्मीर चा विषय मागे सारून, आम्ही तयार झालो आमच्या प्लॅन-बी डेस्टिनेशन ला .
पाऊण एक तासात गाडी जम्मूच्या बाहेर पडली, आणि पुढच्या तासाभरातच नदीवरील एका मोठ्ठ्या पुलापाशी येऊन थांबली.
“सरजी, ये ब्रिज के इस पार जम्मू, और उस पार से पंजाब है जी”, ड्राइव्हर ने माहीती पुरवली.
गाडी ब्रिज ओलांडून पलीकडे गेली आणि जादूची कांडी फिरवावी तशी हवा एकदमच आल्हाददायक झाली. फोटो काढेस्तोवर “Welcome to Vodafone-Punjab” असा व्होडाफोनचा मेसेजही येऊन धडकला.
दोन्ही बाजुंनी गर्द झाडीमुळे काही वेळातच रस्ता अंधारात बुडून गेला. अर्थात जम्मू-ते हिमाचल प्रदेश ह्यांना काही अंतरासाठीच पंजाब प्रांत विच्छेदतो. पठाणकोट ओलांडले कि लगेचच हिमाचल प्रदेश सुरु होईल हि माहिती गुगल-बाबाने पुरवून टाकली .
साधारण ७.३० च्या सुमारास ड्रायव्हरने गाडी ‘चेन्नई-एक्सप्रेस’ नामक हॉटेलपाशी उभी केली.
“यहा लस्सी बहुत बढीया मिलता है” म्हणत तो आत गेला सुध्द्दा. दुपारचाच कुलचा अजून पोटात असल्याने तशी फारशी भूक नव्हती. पण लस्सी ला कसं नाही म्हणायचं? आणि ते पण पंजाबमधल्या? मग सगळेच खाली उतरलो आणि तो मधुर लस्सीचा थंडगार ग्लास ओठी लावला.
आकाशात निळ्या-जांभळ्या रंगांची उधळण झाली होती. हवेतला गारवाही मस्त वाढला होता. सकाळपासून नुसतीच च्याव च्याव करून सगळेच दमले होते. मैकलॉडगंज यायला किमान ३-४ तास तरी होते. गाडीच्या खिडक्या बंद केल्या, टेप वर अरिजित-सिंगची गाणी वाजत होती. नकळत डोळ्यांत झोप अवतरली.
ह्यावेळी काश्मीर नाही जमलं तर नै, काय त्यात एव्हढं?
“हम ही हम है तो क्या हम है, तुम ही तुम हो.. तो क्या तुम हो?”
Which literally means, “What am I just being me, what are you just being you?”
In more implied way, it means why should you and I be just ourselves, why can’t we be United.
After-all, we all were together, happy and safe, and it was more important… than anything else.
[क्रमश:]
Comments
Post a Comment